मुंबई – सनातन संस्थेने हिंसक कारवाया करू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सनातन संस्थेला दिला आहे. सनातन संस्था अशाप्रकारच्या कारवाया करत असल्याचाच आरोप अप्रत्यक्षरीत्या आठवले यांनी अशाप्रकारचा सल्ला देऊन केला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले, सनातन हे हिंसक आणि नक्षलवाद्यांसारख्या कारवाया करत असेल, तर ते योग्य नाही. त्यांनी आपली संस्था चालवायला हरकत नाही, मात्र एखाद्याची हत्या करणे हे चुकीचे आहे. राज्यात विचारांची परंपरा आहे. त्यांनी समाजविघातक काही करू नये, असे ते म्हणाले.
सनातनचे जे लोक हत्या करत असतील त्यांची आणि सनातनची सर्व चौकशी झाली पाहिजे, आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. सनातनच्या माध्यमातून हिंदुराष्ट्र हा विषय समोर आणला जातो आहे. त्याला आपले समर्थन आहे काय, असे विचारले असता आठवले म्हणाले, हा देश संविधानावर चालला पाहिजे. त्यावरच तो उभा राहिला पाहिजे. आम्ही हिंदूराष्ट्र या संकल्पनेशी सहमत नाही. ज्यांचा त्याला पाठिंबा आहे, त्यांना आमचा वैचारिक पाठिंबा नाही. मात्र, यात भाजपची भूमिका ही सर्वधर्मसमभाव अशी आहे, सगळे गुण्यागोविंदाने राहावे असेच भाजपला वाटते. सनातनवर बंदी घालावी का, असा प्रश्न आठवले यांना विचारला असता ते म्हणाले, सनातनवरील बंदीमुळे फरक पडणार नाही. या प्रश्नावर अधिक भाष्य करण्याचे आठवले यांनी टाळले.