मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ६ डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लक्षावधी आंबेडकरी येणाऱ्या अनुयायांना सर्व संबंधित विभागांमार्फत उत्तम सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ( २६ नोव्हेंबर ) सोमवारी दिले आहेत.
सोमवारी ( २६ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात समन्वय समिती व सर्व संबंधित विभागांची बैठक झाली. दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारे विविध उपक्रम हे समन्वय समिती व शासन यांच्यातील उत्तम समन्वयाचे उदाहरण आहे. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची उत्तम व्यवस्था झालीच पाहिजे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने केलेले नियोजन उत्तम आहे. तथापि, त्यातील प्रत्येक घटकांची उजळणी व्हावी, तसेच भविष्यातील आव्हानांचादेखील विचार करून योग्य ते नियोजन करावे. तसेच सदस्यांच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकच्या सूचनांचाही विचार करून त्याची यथायोग्य अंमलबजावणी करावी. असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.
याचबरोबर पोलिस यंत्रणेमार्फतही उत्तम अशी नियंत्रण व्यवस्था राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलिस विभाग यांच्यावतीने करण्यात येणाऱ्या सुविधा व यंत्रणेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
विशेष म्हणजे सर्व सदस्यांचे यासंदर्भातील म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच समन्वय समितीने तयार केलेल्या माहिती पत्रिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. राज पुरोहित, भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, गृह (विशेष) विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल, सह आयुक्त देवेन भारती, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रवी गरुड, चंद्रशेखर कांबळे, समन्वय समितीचे सदस्य सिद्धार्थ कासारे, मयुर कांबळे, ॲड. अभया सोनावणे तसेच सर्व संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.