काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. आता मात्र धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत महायुतीच्या वचननाम्याची होळी केली. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे खासदार पद्मश्री विकास महात्मे यांनी केले. याचबरोबर धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणाच्या धनगर जमातीच्या सर्व मागण्या प्रलंबित आहेत. महायुतीने २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. अजूनही ते पूर्ण केले नाही. भाजपचा खासदार असलो तरी आधी मी धनगर आहे यासाठी हे आंदोलन आहे. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे मुंबई बरोबरच यवतमाळमध्येही धनगर समाजाच्या वतीने वचननाम्याची होळी करण्यात आली आहे. शासनाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. परंतु चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अद्याप दिलेल्या आश्वासनाची पूर्तता युती शासनाने केली नाही. त्यामुळे आज यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात धनगर समाजाच्या वतीने युतीच्या वचननाम्याची होळी करण्यात आली.
धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले जाते मात्र काहीच केले जात नाही. त्यामुळे समाजात याबाबत चीड निर्माण झाली असून धनगर समाजाला आरक्षण लागू न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचे समाजाच्या वतीने ठरवले आहे, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.