कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – अस्पृश्यता हे हीनतेचे नव्हे, तर दीनतेचे कारण आहे. अस्पृश्यता वाहती राखण्यात उच्चवर्णीय समाजाचा स्वार्थ आहे. कारण ती तुंबली की संपली, याची जाणीव असल्याने ती थांबवली जात नाही. त्यामुळे महर्षी शिंदे या साऱ्या व्यवस्थेला ‘बहिष्कृतांची बंदिशाळा’ असे संबोधतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आणि एन. डी. पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन व कार्य’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. गोपाळ गुरू म्हणाले, अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि. रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे.
या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत आणि वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली. मायावी अर्थव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि दमट ग्रामव्यवस्था या तीन व्यवस्थांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न जटिल करून ठेवण्याचे काम केले. महर्षी शिंदे यांची त्यांच्या हयातीत आणि त्या उपरांतही मोठी सामाजिक उपेक्षा झाली. समाजाला खोलवर विचार करणारे लोक नको असतात आणि महर्षी हे त्यांनी अंगीकारलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाचा अत्यंत खोलवर, सर्वांगीण आणि कृतिशील विचार करणारे होते.
साहजिकच त्यामुळे समाजाने त्यांच्यावर उपेक्षेचे शिक्कमोर्तब केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, महर्षी शिंदे हे एक क्रांतिकारक समाजसुधारक होते. आपली संपूर्ण हयात त्यांनी अस्पृश्यता निवारणासारख्या मूलभूत प्रश्नासाठी वेचली आणि आपल्या कार्याने साऱ्या महाराष्ट्राची मान उंचावली. महाराष्ट्राने मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा फारसा गांभीर्याने विचार केला नाही. तरीही अस्पृश्योद्धाराचे कार्य सर्व तऱ्हेची उपेक्षा सोसून ते करत राहिले. एकट्यानेच नव्हे, तर साऱ्या कुटुंबीयांना सोबत घेऊन त्यांनी हे काम केले.