उमापूर : बहुजननामा ऑनलाइन – दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणे दूर ; परंतु गुरांना चारा दावणीला किंवा छावणीला द्या, अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी ‘आपल्याकडील जनावरे पाहुण्यांच्या घरी पाठवा’ असा अजब सल्ला दिला होता. या विधानाचा निषेध करत उमापूर (ता. गेवराई) येथे तरुणांनी बैलजोडीच पोस्टाद्वारे राम शिंदे यांना पाठविण्यासाठी आणली.
पोस्टमास्तरने नकार दिल्यावर त्याने प्रतिकात्मक बैलजोडी पाठवून दिली. राम शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या अजब सल्ल्याचा उमापूरच्या तरुणांनी निषेध केला. शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत ज्ञानेश्वर हवाले, विशाल राऊत, अनिल देशमुख रवि देशमुख यांनी उमापूर येथे पोस्टाद्वारे पाठवण्यासाठी बैलजोडी आणली. त्यामुळे पोस्टातील कर्मचारीही आचंबित झाले.पोस्ट मास्तराने विनंती करुनही तरुण ठाम होते. त्यामुळे बराचवेळ गोंधळ सुरु होता. मात्र, त्याने पोस्टाने बैल पाठवता येत नाही, तशी सोय नाही असे सांगितले. त्यानंतर प्रतिकात्मक बैल जोडीसह पञ पोस्टाद्वारे शिंदे यांना पाठवून देण्यात आले. या आंदोलनाची उमापूर परिसरात दिवसभर चर्चा होती.