मुंबई : बहुजननामा आॅनलाइन – जे आमच्यासोबत आहेत त्या सर्वांनी समूहाचे राजकारण लोकसभेत यशस्वी करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या आदरांजली सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सत्तेवर येण्याची भाजप-संघाचे दंगल हेच मोठे शस्त्र आहे. त्यामुळे ते सत्तेचे युद्ध जिंकण्यासाठी दंगली घडवत आहेत. बुलंदशहर येथे एका पोलीस निरीक्षकाला ज्यांनी डोक्यात गोळी घातली त्याचे नाव पोलिसांनी सांगितले नसते तर या देशात या लोकांनी धर्माच्या नावाने दंगली घडवल्या असत्या. यामुळे लोकसभेची जोपर्यंत तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत हे लोक दंगली घडवत राहतील. मात्र, आपण सावध राहिले पाहिजे. केंद्रात भाजप-संघाचे सरकार येणार नाही, याची मनात खूणगाठ बांधा. कारण या निवडणुकात सेना-भाजप हरली तर त्यांची ही शेवटची निवडणूक ठरणार आहे. यामुळे राज्यात ४८ लोकसभेच्या जागा आहेत. या सर्वच जागांचा निकाल केवळ आपणच लावू शकतो.
मागील वर्षी भीमा कोरेगावच्या निमित्ताने आणि आता अयोध्येच्या निमित्ताने हे लोक दंगल घडवू शकतात यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन या युद्धात आपलीही रणनिती असली पाहिजे कारण या लोकांचे सत्तेवर येण्याचे सर्वात मोठे हत्यार हे दंगली घडवणे हेच आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणे आहेत. ओबीसीच्या ताटातले मराठ्यांना दिल्याने ओबीसी आता मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मराठा आरक्षणाचे राजकारण केले असले तरी त्यातून देशभरात पटेल, जाट, गुर्जर यांच्याही मागण्या पुढे येऊन त्यातून दोन समाजात दंगली घडवल्या जाणार असून त्याची मराठा आरक्षण ही सुरुवात असल्याचेही आंबेडकर म्हणाले. या सभेला अध्यक्षा मिराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि देशभरातून आलेले सभेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.