मुंबई : बहुजननामा आॅनलाइन – रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देऊ अशी घोषणा करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ऐक्याचे तुणतुणे वाजवले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या इतर नेत्यांना आंबेडकरी अनुयायी धारेवर धरत नाहीत. केवळ रामदास आठवले यांनाच धारेवर धरले जाते, अशी खंतही आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले, भाजपमध्ये गेलो म्हणून अनेक नेते माझ्यावर टीका करतात. आंबेडकरी अनुयायी ही आपली ताकद आहे. मी कोणत्याही नेत्याबाबत बोलणार नाही, ते नेते तरी एकत्र येतात का? आंबेडकरी विचारांचे सर्व रिपब्लिकन गट एकत्र येत असतील, तर मी माझ्या मंत्री पदाचा राजीनामा देईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही स्थितीत संविधान बदलणार नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल तर मी त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असे आठवले म्हणाले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात बाबासाहेबांचा पुतळा उभारावा, अशी विनंती करण्यासाठी मी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. मोदी यांच्या काळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लागला आहे. लवकरच हे स्मारक पूर्णत्वाला येईल. या स्मारकाच्या उंचीचा काहीही मुद्दा नसून यातून नक्कीच मार्ग काढला जाईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.