सातारा : बहुजननामा आॅनलाइन – आताच्या काळात वस्तूंचे जागतिकीकरण झाले असले तरी अडीच हजार वर्षांपूर्वी विचारांचं वैश्विकीकरण करणारा बुद्ध असून बुद्ध, कबीर, चार्वाक, फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांची परंपरा ज्या समाजाला असते, तो आंबेडकरी समाज असतो. त्यामुळे आंबेडकरी समाज लोकसंख्येने जरी अल्पसंख्यांक असला तरी तो विचाराने जागतिक (ग्लोबल) असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
भुईंज (ता. वाई) येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर-खंडाळा, समता सामाजिक व शैक्षणिक संस्था वाई आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज चिंतन परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कांबळे बोलत होते. कांबळे म्हणाले, या देशातील संत कबिरांचा विचार जागतिक आहे. छत्रपती शिवरायांचे शौर्य जागतिक आहे, महात्मा फुल्यांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारदेखील जागतिक आहे. या देशाचे विचारांच्या पातळीवर पहिल्यांदा जागतिकीकरण करणारा पहिला महापुरुष भगवान गौतम बुद्ध आहे.
यावेळी अशोक गायकवाड, पंकज धिवार, प्रा.डॉ. रोहिदास जाधव, प्रा. शिवाजी राऊत, माजी सरपंच बाळासाहेब कांबळे, सतीश कुलकर्णी, सुरेश खराते, सुनीता केदार, भाऊसाहेब सपकाळ, विशाल सपकाळ, अमर बनसोडे, अमोल गाडे आदी उपस्थित होते.