औरंगाबाद : बहुजननामा आॅनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील जागांपैकी बहुतांश लोकसभा मतदारसंघांचे वाटप झाले असले तरी औरंगाबादसह राज्यातील अन्य तीन जागांचा तिढा कायम आहे. त्यामुळे औरंगाबादसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून जोर लावला जात आहे. रविवारी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या सभेसाठी जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात काँग्रेसपेक्षा तीन खासदारांची संख्या वाढवली आहे. यामध्ये नाना पटोले यांची भंडारा-गोंदियाची जागा पोटनिवडणुकीत जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. त्या बदल्यात राज्यातील इतर जागा काँग्रेसला देऊन औरंगाबादची दुसरी जागा सोडवून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे औरंगाबादसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून वातावरण निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले विद्यार्थी नेते कन्हैय्याकुमार यांना राष्ट्रवादीकडून मदतीसाठी हाक दिल्याचे दिसून येत आहे.
संयोजन समितीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटी, ए.आय.आय.एस.एफ, बामुक्टो, बामुक्टा, एस.एफ.आय, एन.एस.यू.आय, ए.आय.वाय.एफ, बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा, गब्बर ॲक्शन कमिटी, शेतकरी कामगार विद्यार्थी संघटना, पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटना, रिपब्लिकन बहुजन सेना, भारतीय दलित पँथर युवा आघाडी, आझाद यूवा ब्रीगेड, मायनॉरिटी यूथ फाऊंडेशन, ऑल इंडिया तंजीमे इन्साफ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आदी डझनभर संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.