रायगड : बहुजननामा आॅनलाइन – भाजपा सरकार हे संविधानविरोधी आहे. संविधान बदलण्यासाठी ते सत्तेत आले असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहा येथे बोलताना केला. संविधान बुडवण्याची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारकडून संविधानाचे रक्षण केले पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत कोकण विभागीय महिला मेळावा रोहा येथे पार पडला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, भाजपाचा एक मंत्री आम्ही संविधान बदलणार आहोत असे म्हणतो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही. संविधानाची शपथ घ्यायची आणि त्याची प्रतारणा करायची ही भाजपा सरकारची कार्यपद्धती आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे, त्यातूनच त्या पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट होतात. गायीला वाचवण्यासाठी माणसांना ठार मारण्याचे प्रकार घडत आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. राममंदिर हा निवडणुकीचा मुद्दा आहे. मंदिर बांधण्यासाठी आजूबाजूच्या इमारती हटवण्यात येत आहेत. लोकांना हटवून रामराज्य कसे येणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुनील तटकरे म्हणाले, आतापर्यंत कोणत्याच सरकारने संविधानाची चौकट मोडली नाही. सार्वभौम विचारही सोडला नाही. पण धर्माच्या नावाखाली आता विचारांचे ध्रुवीकरण सुरू आहे. त्याला संघटित होऊन थोपवण्याची वेळ आली आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, आ. विद्या चव्हाण, आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे उपस्थित होत्या.