कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – श्रमिक मुक्ती दल, निर्मिती विचारमंच आणि समविचारी संघटनेच्या वतीने धर्मांध जातीयवाद्यांचा बीमोड करण्यासाठी २८ रोजी सकाळी ११ वाजता निर्धार परिषदेचे आयोजन केले आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यभरातून विचारवंत येणार असल्याची माहिती कोल्हापूर येथे डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटणकर म्हणाले, नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्व जनतेचा अधिकार आहे. ती कोणा उद्योजकाची मालमत्ता नाही. त्यामुळे हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांचा वापर उद्योगासाठी करणार असेल तर त्याचा मोबादला त्या त्या गावातील जनतेला दिला पाहिजे, यासाठी यापुढे लढा दिला जाणार आहे. सर्वसामान्यांचा विकास हाच खरा विकास आहे. हा समान विकास आहे. गुलामी संपवणारा सार्वत्रिक विकास आहे. या विकासाच्या आड येणाऱ्या, जनतेला उद्ध्वस्त करणाऱ्या जातीयवादी, धर्मांधांचा बीमोड करण्याची शपथ या परिषदेत घेण्यात येणार आहे.
निर्धार परिषदेसाठी समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही शाहिरी जलसा आयोजित केला आहे. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. गेल ऑम्वेट, अनिल म्हमाने उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, आतापर्यंत धमकीची आठ पत्रे आली आहेत; पण मी घाबरत नाही. धर्मांध शक्ती विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे काम आम्ही सुरूच ठेवणार आहे. विचारवंतांना मारून विचार संपत नाही, हे खरे असले तरी किती विचारवंतांचे मृत्यू बघायचे? आता हे खपवून घेतले जाणार नाही. सनातन संस्थेवर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा केल्याचे सांगण्यात येते, तर त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करून डॉ. भारत पाटणकर म्हणाले, अंबाबाई ही गणमाता आहे, आदिमाता आहे. तिथला कारभार लोकशाही पद्धतीनेच झाला पाहिजे, या मागणीसाठी आग्रही आहोत. विशिष्ट लोकांनाच पुजारी करता कामा नये. त्यासाठी कायदेशीर भरती करून प्रशिक्षण देऊन पगारी सेवेकरी नेमावेत. त्यामध्ये सर्वच जातिधर्माच्या स्त्री-पुरुषांचा समावेश असावा.