औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – राज्यासह देशभरात सध्या जातीयवादी शक्ती वाढत असून त्यास खतपाणी घालण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. घटना आणि कायदे बदलण्याची मोहीमसुद्धा केंद्राने हाती घेतल्यामुळे या शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षांशी आमचे राजकीय मतभेद आहेत. पण दलित, वंचितांच्या हितासाठी दोन पावले मागे येण्यास आम्ही तयार आहोत, असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, माजी खासदार उत्तमसिंग पवार यांना औरंगाबादसह मराठवाड्याचा चांगलाच राजकीय अभ्यास आहे. तुमच्या पक्षासोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी तुमच्यासारखी माणसं पुढे आली पाहिजेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात तुम्ही सक्रिय व्हा, निश्चितच परिवर्तन होईल, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गंगाधर गाडे यांनी आयुष्यात कधीच तडजोड केली नाही. बाबासाहेबांच्या विचारांचा लढा त्यांनी सदैव तेवत ठेवला असून आगामी काळात त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही सर्व शक्तिनिशी उभे राहणार आहोत.
केंद्र सरकार घटना, कायदे बदलण्याचा घाट रचत आहे. त्यांना वेळीच रोखले नाही तर भविष्यात दलित, वंचितांवर अन्याय, अत्याचारांच्या घटना वाढतील. अशा परिस्थितीत समविचारी पक्षांनी राजकीय मतभेद विसरून एका छताखाली येण्याची गरज आहे. सत्तेसाठी लाचार होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून दूर जात रामदास आठवले जातीयवादी शक्तींजवळ गेल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.
या कार्यक्रमात दिलीप महालिंगे, नारायण पुरी, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. आदिनाथ इंगोले, साहेबराव हिवराळे, प्राजक्ता संजीवनी प्रभाकर, कुणाल वराळे, मधुकर खिल्लारे आदींना विविध पुरस्कार देत उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. व्यासपीठावर माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, कामगार नेते कॉ. उद्धव भवलकर, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरीअल नॅशनल कमिटी दिल्लीचे उपाध्यक्ष इंजि. मिलिंद पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस विकास शिंदे, डॉ. प्रतिभा अहिरे, कृषिभूषण भाऊसाहेब थोरात, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्याध्यक्ष सूर्यकांता गाडे आदी उपस्थित होते.