औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – ‘भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. मात्र आम्ही ऐऱ्या-गैऱ्यांना प्रवेश देणार नाही’ असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. रविवारी ते एका मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, “लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच वंचितची फाईट आहे.”
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, “वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसला विधानसभा निवडणूक लढवायची असेल. तर आम्ही दिलेली 40 जागांची ऑफर आमचे 288 उमेदवार जाहीर करेपर्यंतच आहे.”
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “सध्या राष्ट्रभक्तीचा केवळ देखावा सुरु आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, पाकिस्तानला संपवू. त्यांना कोणी थांबवले? गल्लीतील भांडणाप्रमाणे मोदी हूल देत आहेत. क्रिमिलेअरमुळे बंजारा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सत्तेतील हिंदुत्ववादी पक्ष त्यांना न्याय देत नाहीत.”
यावेळी इम्तियाज जलील म्हणाले की, “या देशात जे काही घडत आहे ते मोदींमुळेच घडत आहे असा प्रचार सध्या सत्ताधारी करत आहेत. ऊन पाऊसही मोदींमुळेच पडतो असे चित्र उभे केले जात आहे. लोकसभा तो झाँकी थी, विधानसभा की पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.