अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात एंट्री मारून विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे हे निवडून येताच चांगलेच कामाला लागले आहेत. विकासकामाबाबत बोलताना ते म्हणाले की ,’विकासकामांच्या संदर्भात प्रशासनाने बैठक घेताना लोकप्रतिनीधींना सहभागी करून घेतले पाहीजे. एकत्रित समन्वयाने काम केल्यास कामांबाबत शंका निर्माण होणार नाहीत’ असे मत खासदार विखेंनी व्यक्त केले आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीत नगर मतदारसंघातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या संदर्भातील कामाची सद्यपरिस्थिती, अपेक्षित असलेल्या आणि निधीसाठी सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची माहिती अधिकाऱ्यांनी विखे यांना दिली. लोकांच्या सहमतीने नगर मतदारसंघातील प्रत्येक तालुका हा राष्ट्रीय महामार्गाने जोडला जावा. तसेच मतदारसंघातील रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने निधीची उपलब्थता करण्यासाठी प्रयत्न आहेत.
येत्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांचा आढावा आपण घेतला. यामध्ये जिल्ह्यातील रस्ते विकासाला किती निधीची आवश्यकता आहे, कोणते प्रस्ताव सादर झाले आहेत, याची माहीती घेतली असून त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमवेत अधिवेशन काळात बैठक घेणार असून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलावून याबाबतचे निर्णय करण्यास आपला प्राधान्यक्रम असेल,’ असेही विखे यांनी या बैठकीनंतर माहिती देताना सांगितले.
दिवसेंदिवस नगर शहरातून ट्राफिक वाढत चालली असून नगरमधील उड्डाणपुलाचे काम आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. सध्या सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे वेळेत पूर्ण करणे, स्थानिक लोकांवर अन्याय होऊ न देता प्रत्येक तालुका महामार्गाला जोडला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.