मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत वंचितला औरंगाबादची जागा वगळता इतर ठिकाणी हार पत्करावी लागली असली तरी मिळालेल्या मतांचा अभ्यास केल्यास महाआघाडीला अनेक जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा मेगाप्लॅन सांगितला.
लोकसभेत झालेल्या चुका टाळून येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार असून राज्यातील वंचित घटकाचा आम्ही आवाज होऊ. राज्यात दुष्काळ असून मान्सून लांबल्यामुळे सध्या राज्यात पाणी टंचाई आहे. नेमका हाच मुद्दा आम्ही निवडणुकीत उपस्थित करू, विरोधकानीं कधीच हा प्रश्न लावून धरला नाही. निवडणुकीपूर्वी मतदारांना आमचे व्हिजन सांगू आणि त्याआधारेच मतदान करण्याचे आव्हान करू. इतकच नव्हे तर लवकरच वंचित आघाडी संपूर्ण देशभरात विस्तार करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. आम्ही ठरवलेल्या मुद्यांच्या आधारे आम्ही आज देखील आघाडी करण्यास तयार आहोत. महाआघाडी लोकसभेलाही आणि आताही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. माध्यमांमध्ये वंचितसोबत आघाडी करण्यासंदर्भातील बातम्या येत आहेत. पण माझ्याशी अधिकृत कोणीही संपर्क केला नाही. जर महाआघाडीने स्वत:च्या चूकांपासून शिकण्याची तयारी दाखवली आणि पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली तर वंचित आघाडी त्याच्यासोबत जाण्याचा विचार करू शकते.
‘वंचितने’ लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवताना जवळपास १४ टक्के मते मिळवली. हे एक मोठे यश असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आम्ही सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेत नसून केवळ विजय मिळवणे. हा एकमेव हेतू आमचा नसून वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाचा विचार करत असल्याचे ते म्हणाले. लोकसभेत जागावाटपावरून महाआघाडीबरोबर झालेली बिघाडी ही अवास्तव जागांच्या मागणीवरून बिघडल्याचा आरोप महाआघाडीने वंचितवर केला होता. हा आरोप आंबेडकरांनी फेटाळून लावला. भाजपने काँग्रेससह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी विविध खटल्यांमध्ये फसवले होते. त्यामुळेच आघाडी होऊ शकली नाही असे त्यांनी सांगितले.