मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यावर आक्षेप घेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी वंचितला महाआघाडीत येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले आहे. ते धक्कादायक आणि धोकादायक आहे. येणाऱ्या विधानसभेत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये. तसेच वंचितला चांगल्या जागा मिळाल्या तर त्यांनी महाआघाडीत सहभागी व्हावे, असे मत कवाडे व्यक्त केले.
येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. यामध्ये प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे गुरुजी, पक्षाचे प्रवक्ते चरणदास इंगोले, मुंबई अध्यक्ष मिलिंद सुर्वे आदी उपस्थित होते.
दरम्यान , येत्या विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाआघाडीसोबत राहील. तसेच विधानसभेच्या ५१ जागा लढविणार असून काही जागांची यादी महाआघाडीतील मित्रपक्षांना दिली आहे.