सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – ‘देश चालविण्यासाठी बुद्धीची गरज असते छप्पन्न इंच छातीची नाही’ अशा शब्दात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आपली लढत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात नाही,तर भाजपच्या विरोधात आहे असे नमूद करताना लोकसभा मतमोजणी होईल तेव्हा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर फेकले जातील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला.
लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले प्रकाश आंबेडकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकरांच्या नातवाने एमआयएमसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करून लोकशाहीचा आणि राज्य घटनेचा खून केला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता, त्याकडे लक्ष वेधले असता आंबेडकर यांनी त्या आरोपाला बेदखल केले. अशा टीकेला उत्तर देण्याचे कारण नाही. आपण कामानेच टीकेला उत्तर देण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी शिंदे यांच्यावर हल्ला करताना आंबेडकर म्हणाले, की सुशीलकुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्याच सोलापुरातील पाच निष्पाप तरूणांना दहशतवादी म्हणून पकडून भोपाळला नेले जाते. त्यापैकी एका तरूणाचा चकमक दाखवून ठार मारले जाते. खरे तर ती चकमक नव्हती तर तो खूनच होता. शिंदे यांनी त्या वेळी गृहमंत्री या नात्याने भोपाळच्या पोलिसांकडे साधी विचारणा तरी केली होती काय, असा सवाल आंबेडकर यांनी केला.