नवी दिल्ली : समाचार ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत दिल्लीत विजयाची परंपरा पुन्हा राखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही कंबर कसली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास दिल्लीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच भूमिपुत्रांनाही सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणाच अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्लीतील खिचडीपूर गावात आयोजित एका रॅलीला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यानी ही घोषणा केली. दिल्लीतील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्यात येईल, दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला घर देण्यात येईल आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थाही राखली जाईल, अस केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीतील विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण मिळूनही कोणत्याच महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. इतर राज्यांमधील महाविद्यालयात स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ८५ टक्के जागा राखीव असतात. यावेळी त्यांनी दिल्ली विद्यापीठातील एका महाविद्यालयाचं उदाहरण दिलं. या महाविद्यालयात १५० जागा होत्या. त्यापैकी १४० जागांवर तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. असंच जर होत राहिलं तर दिल्लीतील विद्यार्थी जाणार कुठे? असा सवाल करतानाच दिल्लीत इयत्ता १२वीला पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ८५ टक्के जागा राखीव ठेवायलाच हव्या, असं त्यांनी स्पष्ट केलं. तरच दिल्लीतील विदयार्थ्यांना न्याय मिळेल आणि तेव्हाच शक्य होईल जेव्हा आम आदमी पार्टीचे सरकार पुन्हा येईल असेही ते बोलले .