नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करू असा दावा करत असताना मात्र संपूर्ण देशाची स्थिती काश्मीरसारखी झाली आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. यशवंत सिन्हा यांनी भाजपमधून बाहेर पडल्यावर अनेक मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरले आहे. जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले. काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा काढला जावा, म्हणून सरकारने कलम ३७० आणि ३५ अ हटवले आहे. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
सरकारमधील लोकांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्याप्रमाणे बनवतील, पण आज पाच महिन्यानंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे, असे सिन्हा म्हणाले. काश्मीरमधील शोपियान, बारामुल्ला किंवा पुलवामा येथे गेले तर त्यांना सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसून येईल. आणि आता तशीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे जिथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात असल्याचे दिसून येते, असेही सिन्हा म्हणाले.
जेएनयूमधील हिंसाचाराबद्दल बोलताना पाहाल तिथे दडपशाहीचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले. अगोदर दडपण्यासाठी ते पोलिसांचा वापर करत असत. पण आता ते गुंडांचा वापर करत आहेत. तसेच जेएनयूमधील सरकारी पोलीस आणि सरकारी गुंडांमधील फरक संपला असल्याचेही ते म्हणाले. पोलीस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत, तर ते गुंडांना मदत करतात. ही संपूर्ण देशातील विचित्र स्थिती आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.