मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण महाविकास आघाडीतील तीन पक्ष हे वेगवेगळी विचारधारा असणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यात अनेक वाद होत आहेत. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट बैठकीदरम्यान बसण्याच्या खुर्चीवरून भुजबळ आणि चव्हाण यांच्यात वाद झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमके काय चालू आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु भुजबळ आणि चव्हाण यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नाराज असलेले विजय वडेट्टीवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. विरोधी पक्षनेतेपद सांभाळले असूनही त्यांना महत्वाची खाती देताना डावलले गेले आहे, असे सांगितले जात आहे.
याअगोदर शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवरून राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते. त्याच वेळी ठाकरे सरकारच्या पतनाला सुरुवात झाली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. परंतु नंतर माझ्या राजीनाम्याच्या बातम्या या विरोधकांनी सोडलेल्या पुड्या असून अफवा आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते.
तसेच काँग्रेसला अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना मोठी खाती मिळवून देण्यासाठी कृषीखाते हवे होते. तेव्हा महाविकास आघाडीच्या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांने नाव काढले असताना अशोक चव्हाण यांनी ते मंत्रिमंडळात नसताना त्यांचा इथे काय संबंध, असा सवाल केला. त्यावर अजित पवारांनी आधी तुमचा नेता ठरावा, मग नंतर बोलू, असे म्हणल्यानंतर चव्हाण तिथून निघून गेले.