मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज विधानभेत काँगेसचे नाना पटोले यांची बिनबिरोध निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात उपस्थित सर्व नेत्यांनी पटोले यांचे अभिनंदनपर भाषण केले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील भाषण करत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘मला माझ्या व्यंगाचं दु:ख वाटत नाही. तर अभिमानच वाटतो,’ असे म्हणत बागडे यांनी आणीबाणीचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. ‘विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूनं ऐकायला येत नाही, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली. त्यावर हरिभाऊ बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिले आहे.
हरिभाऊ बागडे म्हणाले की, ‘मी विरोधकांचे ऐकले नाही, हा आरोप खोटा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ३-३ तासांची चर्चा ८ तास चालवली. परंतु, मला एका कानाने ऐकू येत नाही, हे अनेकांना माहिती नाही. ते माझं आजचं व्यंग नाही. तसेच ते लहानपणाचं पण नाही. तर ते आणीबाणीच्या काळातलं आहे आणि मला त्याचा रास्त अभिमान आहे. त्यावेळी माझ्याकडे सत्याग्रह करण्याचं काम होतं. त्यामुळे मी दिवस-रात्र हिंडायचो. प्रचंड थंडीतून प्रवास करायचो. त्या थंडीत हातपाय बधीर व्हायचे. त्याचा परिणाम शरीरावर झाला. मी बेशुद्ध पडलो. पण २-३ दिवस डॉक्टरकडे गेलो नाही. तेव्हा मला ऐकू यायचं नाही. या घटनेला आता ४५ वर्ष झाली. काहींना हे माहीत नसेल, म्हणून आज मी हे सांगतो आहे.’
तसेच आणीबाणीच्या वेळी कुठे होतात सांगू का ? पण ते आज मी सांगणार नाही. कारण मी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करायला उभा आहे’, असं बागडे यांनी म्हटलं.
विधानसभा अध्यक्षपदाची आज होणारी निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली . हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पटोलेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.