मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते म्ह्णून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन करत खोचक टोलाही लगावला आहे. ‘मी इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं. पण आयुष्य म्हणजे रंगभूमी आहे. इथं कधी कोणाला कोणती भूमिका करावी लागेल सांगता येत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ वरुन चिमटा काढला. त्याचबरोबर ‘यापुढे विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं मी म्हणेन. कारण विरोधकदेखील माझे मित्र आहेत. माझी आणि त्यांची मैत्री फार जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील,’ असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी असा पहिलाच मुख्यमंत्री आहे, ज्याच्या समोरचा विरोधी पक्ष त्याचा ३० वर्ष जुना मित्र आहे आणि सोबत असलेले सहकारी आतापर्यंतचे राजकीय विरोधक आहेत. विरोधी पक्षात बसलेल्यांना मी विरोधक समजत नाही. कारण ते माझे मित्रच आहेत. तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवली नाही आणि यापुढेही लपवणार नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काल मी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काय बोललो, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र बंद दाराआड आणि कानात काय बोललो ते सांगण्याची आमची संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांना लगावला आहे. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता. मला इथं यावं लागलं नसतं. कारण इथे येईन असं मी कधीच म्हटलं नव्हतं, असा चिमटा काढत विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारला सहकार्य कराल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यक्त केली आहे.