मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ज्यांच्याबरोबर कधीही संग करणारा नाही. एकवेळ अविवाहित राहू पण अजित पवार यांच्याबरोबर जाणार नाही, त्यांना चक्की पिसायला लावू अशी गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीत अजित पवार यांच्याशी संग करुन परत सत्ता मिळविण्याचा केलेल्या प्रयत्नामुळे भाजपाच्या समर्थकांनाही मोठा धक्का बसला होता. कधी असे होऊ शकले असा विचारही न केलेल्या भाजपाच्या समर्थकांना हा एक मोठा धक्का होता.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना फोडल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आव्हान दिले गेले. शरद पवार यांना कुटुंबातूनच जो धक्का बसला. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपेक्षाही अधिक शक्ती पणाला लावली. पूर्वी जे सरकार अंतर्गत लाथाळ्यामुळे काही महिने अथवा वर्षात पडले असते. तितकीही थांबण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांना नव्हती. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे आता येणारे सरकार अधिक सक्षम होणार आहे. तिन्ही पक्षांना आता हे सरकार पाच वर्षे चालविण्याची जबाबदारी आली आहे. विशेषत: शरद पवार आणि शिवसेना आता कोणत्याही परिस्थिती सरकार पडु देणार नाही ही त्याची परिणिती झाली आहे.
केंद्रात भाजपाचे सरकार आणि तेही प्रचंड बहुमताने २०१४ मध्ये आले. तेव्हापासूनच त्यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी देशभरात आपली हुकुमत गाजविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यात भाजपाला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही फोडाफोडी करुन त्यांनी राज्य मिळविले होते. ही त्यामानाने छोटी राज्ये आहेत. त्याचा देशभरात फारसा परिणाम झाला नाही. पण कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार फोडून त्यांनी आपले राज्य स्थापन केल्याने भाजपा सत्तेसाठी काहीही विधीनिषेध बाळगत नाही, असा जनतेचा समज झाला आहे.
देवेंद्र फडणवीस हे २०१४ जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची एक अभ्यासु आमदार अशी म्हणून ओळख निर्माण झाली होती. पण सत्ता माणसाला सत्तांध कशी बनविते हे जशी वर्षे पुढे सरकू लागली तसे दिसू लागले. त्यांनी आपल्या मार्गातील सर्व पक्षांतर्गत विरोधकांना बाजूला सारण्यात यश मिळविले. तेव्हा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गात कोणीही विरोधक नाही हे लक्षात येताच त्यांच्यातील सत्तांध अधिक बाहेर आला. त्यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केली. ही घोषणा त्यांच्या उतरणीतील पहिली पायरी ठरली. पाच वर्षे शिवसेनेला मुठीत ठेवून आपण म्हणू तसे वागवले. त्यामुळे शिवसेना संधीची वाट पहात होती. निवडणुकीतील सर्वांना मिळालेल्या यशाने शिवसेनेला ही संधी मिळाली. त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. ती धुडकावली गेली. त्यातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी आकाराला येऊ लागली होती.
ज्या शरद पवार यांना निवडणुकी पंतप्रधानांसह सर्वांनी टारगेट केले होते. अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली गेली. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर थेट अजित पवार यांच्या घरी पोलीस पोहचले असल्याचा दावाही करुन टाकला होता. अशा अजित पवार यांना बरोबर घेऊन राज्यपालांना हाताशी धरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवून आपला शपथविधी घडवून आणला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनी मदत केली. शनिवारी सकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर अजित पवार शपथ घेताना पाहून भाजपाच्या समर्थकांनाही धक्का बसला. अगदी आमदारांनाही न कळविता हा शपथविधी केल्याने हा सर्व चोरीचा मामला होता. अजित पवार यांच्याकडे असलेल्या व्हीपच्या निर्णयाचा आधार घेऊन सत्ता बळविण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी जो प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची किती नैतिक घसरण झाली, हे सर्व देशाने पाहिले.
भाजपाची सत्ता येण्याच्या आनंदापेक्षा अजित पवार यांचे पाय धरण्याची वेळ आली. याचे भाजपाच्या समर्थकांना दु:ख जास्त झाले होते. त्यामुळे सत्ता आली तरी राज्यात ज्या प्रमाणात जल्लोष दिसायला पाहिजे तो दिसून आला नाही. त्याबरोबर सोमवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ९ गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अजित पवार यांना शुद्ध करुन घेण्यास सुरुवात झाली असल्याचा समज झाला आहे. आता राजीनामा देण्याची वेळ आल्याने भाजपा त्यांच्या समर्थकांच्या नजरेतूनही उतरला आहे. त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षाच्या सत्तेमुळे ते कसे सत्तांध झाले आहे. अजित पवार यांना आमदारांचा पाठिंबा नाही़ हे माहिती असताना केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन सरकार स्थापन करण्याची जी घाई केली. त्यामुळे त्यांची वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.
Visit : bahujannama.com