पुणे : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या विधानसभेसाठी भाजप -शिवसेना युतीचे जागावाटपाबाबत फिफ्टी फिफ्टी चा फॉर्मुला ठरला आहे आणि मित्रपक्षांना १८ जागा देण्याचे फायनल झाले आहे. यातच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांची भूमीका मंडळी आहे. ते म्हणाले कि, लोकसभेसाठी आम्ही भाजपासोबत होतो. आम्ही एकही जागा लढवली नाही आणि येणाऱ्या विधानसभेसाठी मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. त्यांनी मित्रपक्षांना जागा देणार असे सांगितले आहे. जर त्यांनी जागा दिली तर आमचे उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढतील.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, रयत क्रांती ही शेतकरी संघटना आहे, कोणता राजकीय पक्ष नाही, त्यामुळेच असा निर्णय घेतला आहे, असे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. खरीप हंगामाची पुणे विभागाची माहिती घेण्यासाठी खोत सोमवारी विधानभवनात आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
येत्या ६ जूनला रयत क्रांतीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गंगाधाम येथे बोलावली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, शेतकऱ्यांची स्थिती, त्यावरचे उपाय अशा महत्वाच्या विषयांबरोबरच विधानसभेसाठी घ्यायची भूमिका यावरही मंथन होईल. त्यानंतर त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाईल व त्यात जागांची मागणी केली जाईल. मागील वेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याआधी खरीप हंगामाबाबत विभागीय बैठका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही.येत्या ७ जूनला मुख्यमंत्र्यांनी थेट राज्याचीच बैठक आयोजित केली आहे. त्यात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा होऊन योजना तयार करण्यात येईल, असेही खोत यांनी सांगितले.