संगमनेर : बहुजननामा ऑनलाइन – मी भेटलो असेल तर आमचे काही लोक तुमच्याकडे येणार असल्याचे सांगण्यासाठी भेटलो असेल आणि तसेच घडले, असे प्रतिउत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांना देऊन त्यांच्यावरच बाजी उलटविली आहे.
राधाकृष्ण विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून अहमदनगर भाजपामध्ये वाद सुरु झाला. विधानसभा निवडणुकीनंतर आता तो वाद शिगेला पोहचला आहे. त्यात विखे आणि थोरात हे यापूर्वी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे विळ्या भोपळ्याचे नाते कोणापासून लपून राहिले नव्हते. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपामध्ये गेल्यानंतर तो अधिक स्पष्टपणे समोर आला आहे. राधाकृष्ण विखे हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्यास उत्सुक अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्या होत्या. त्यातून पुन्हा नगरच्या राजकारणाची चर्चा सुरु झाली होती.
त्यावर आपण आता कोठेही जाणार नाही. दोन वर्षापूर्वी बाळासाहेब थोरात भाजपाच्या संपर्कात होते, असा घणाघाती आरोप शनिवारी राधाकृष्ण विखे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी सव्याज परतफेड केली.
थोरात यांनी सांगितले की, अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही. सत्ता बदलली आता कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असावी, असा टोला त्यांनी विखे यांना लागवला. जिल्ह्यात जे काही आव्हान येईल, त्याला सामोरे जाणार असून काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत आपण काम करत आलो आहे आणि यापुढेही काम करत राहणार आहे.