मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर घेतलेल्या माध्यमांच्या बैठकीत फडणवीस यांनी अनेक गोष्टींचा खुलासा करत शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. फडणवीसांचे हेच आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहे. ‘सत्ता स्थापनेचा दावा न केल्यामुळे त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे मात्र आम्हाला त्यांचीच काळजी आहे’ असे देखील संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द न दिल्याचे या बैठकीत सांगितले होते. मात्र फडवीसांच्या या वक्तव्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच उत्तर देतील असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान फडणवीस यांनी सांगितले कि, ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्याबाबत किंवा शिवसेनेबाबत आम्ही कोणतेही अपमानास्पद वक्तव्य केले नाही मात्र शिवसेना भाजप आणि नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करत होती, आसा आरोपही फडणवीस यांनी केला. मात्र संजय राऊत यांनी फडणवीसांचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत,आम्ही गेल्या पंधरा दिवसात भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही टीका केली नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच !
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सत्ता स्थापनेबाबत पत्रकारांनी विचारले असता पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होऊ शकतो आणि आम्ही यावर ठाम असल्याचेही राऊत यांनी ठणकावून सांगितले. मात्र यासाठीच्या संख्याबळावर बोलणे राऊत यांनी टाळले.
Visit : bahujannama.com