मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक स्वबळावर लढवणा-या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा देखील स्वबळावरच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेतील सर्वच २८८ जागांवर वंचित आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यासाठीची पहिली उमेदवारी यादी ३० जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला तब्बल ४० लाख मत मिळाली होती. तर काही ठिकाणी वंचितचे उमेदवार दुस-या किंवा तिस-या जागेवर होते. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांचा वंचितच्या उमेदवारांमुळेच पराभव झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत काँग्रेस आघाडी करेल, अशी वक्तव्य काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र काँग्रेस असो की इतर कोणताही पक्ष आमची कोणत्याही पक्षाशी बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून वंचित आघाडीला भाजपाची बी टीम संबोधण्यात आले होते. त्यामुळे आता त्यासंदभार्त काँग्रेसने पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी, अशी मागणी देखील आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली.
– वंचित स्वतंत्र लढण्याचा फटका काँग्रेसला
काँग्रेस पक्षाची परंपरागत दलित व मुस्लिम मते वंचित आघाडीकडे वळल्याचे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. वंचित आघाडीचा औरंगाबदमध्ये एकमेव खासदार इमतियाझ जलील लोकसभेत निवडुन आले. मात्र राज्यात ८ ते १० ठिकाणी वंचितमुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा विधानसभेत स्वतंत्र लढण्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार आहे.