मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना चारा छावण्यांच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले गेले आहे. या अनुदान लाटणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मराठवाड्यात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था दाखवून छावण्या सुरू केल्या व त्यातून करोडो रुपयांचा घोटाळा करत सरकारी अनुदान लाटले. छावणीत जनावरांची संख्या कमी आहे त्यापेक्षा जास्त दाखवून अनुदान घश्यात घालण्याचे काम शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याची टीका चव्हाण यांनी केली. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची तपासणी केली असता या छावण्यांमध्ये प्रत्यक्षात कमी प्रमाणात जनावरे दिसून आली, मात्र आहे त्यापेक्षा जास्त जनावरांचे अनुदान लाटण्यात आल्याचे उघड झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
जनावरांची वाढीव संख्या दाखवून दिवसाला ७ लाख ते १४ लाख रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या कारवाईत तब्बल १६ हजार जनावरे कमी आढळून आली आहेत. अशाच पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या बोगस दाखवून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे. बीडसह राज्यातील इतर सर्व चारा छावण्यांचे ऑडिट केले तर हा घोटाळा यापेक्षाही मोठा असल्याचे समोर येईल. सरकारने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने चारा छावण्यांचे ऑडिट करून सरकारी अनुदान लाटणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.