सातारा बहुजननामा ऑनलाईन – देशभरातील अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेली मतं आणि मोजलेली मतं यामध्ये अनेक मतदार संघामध्ये तफावत आढळून आली. यासंदर्भात राज्यात देखील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यातच सातारा लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही मतमोजणीतील फरकावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
देशातून ईव्हीएमबद्दल इतक्या तक्रारी येऊनही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या, मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे खासदार उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे. जगातील प्रगत देशांनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मग आपल्या येथेच का याचा आग्रह होतोय. एक हजार मतदान घेण्यासाठी ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपये खर्च येतो. आणि बॅलेट पेपरसाठी एक हजार तीनशे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात जो फरक आढळून आला आहे. त्याबाबत खुलासा करावा असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.