नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीनदरम्यान उसळलेल्या अभूतपूर्वी संघर्षाबद्दल संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोर्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे 43 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.
भारताचेही 20 जवान शहीद झाले असून, यात भारताच्या कर्नल हुद्दयाच्या लष्करी अधिकार्याचा समावेश आहे. भारत आणि चीन दोन्ही बाजूच्या सैन्याची जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लष्कराने जारी केलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमधील गलवाण खोर्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे 43 जवान ठार अथवा जखमी झाले आहेत.
घटनेनंतर सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांना प्राण गमावावा लागल्याने गुतारेस यांनी दुख: व्यक्त केले आहे. गुतारेस यांचे प्रवक्त्यांनी मंगळवारी रात्री उशीरा एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) आणि सैनिकांच्या मृत्यूची बातमी समोर येत असून यासंदर्भात संयुक्त राष्टाला चिंता वाटत आहे. आम्ही दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन करत आहोत, असे कनेको यांनी म्हटले आहे.