चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीयांना दिलेल्या एका मताचे मूल्य अजूनही आपल्या लक्षात आलेले नाही. निवडणुकांमध्ये लहानशा प्रलोभनाला बळी पडून आपले मत वाया दवडत असतो. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. आतातरी आपल्या मताचे महत्त्व समजून आपल्या हितरक्षणासाठी त्यांचा दिव्यास्त्राप्रमाणे वापर करणे हे आदिवासींनी शिकले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध विचारवंत व ज्येष्ठ आदिवासी नेते प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी व्यक्त केले.
अ.भा.क्रां. नारायणसिंह उईके संघर्ष समितीद्वारा आयोजित तिसऱ्या आदिवासी राजकीय चिंतन बैठकीच्या निमित्ताने ‘आदिवासींचा स्वतंत्र राजकीय पक्ष : आदिवासींच्या अस्तित्व, अस्मिता आणि हितरक्षणाचे दिव्यास्त्र’ या विषयावर बल्लारपुरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या आदिवासी राजकीय चिंतन बैठकीत त्यांनी राजकीय पक्ष स्थापण्याची घोषणा करून पक्षाला कोणते नाव द्यावे, यावरही विचार प्रगट केले. पक्षाची राज्य, राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना मौन पाळून श्रद्धांजली सभागृहाने वाहिली. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार तथा नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी केले. राजकीय पक्ष बांधणीसाठी आदिवासींची लोकचळवळ निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. वामन शेळमाके, ॲड. हरीश गेडाम, प्रशांत सोनुने या विचारवंतांनी आपले रोखठोक विचार मांडले. यावेळी मंचावर बळीराज धोटे, प्राचार्या अनिता पंधरे, लिना कुसराम, दिलीप कुळसंगे, महादेव सिडाम आदींची उपस्थिती होती. यावेळी आदिवासी सेवेचे उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, प्रशांत सोनुने, मिनाक्षी गेडाम यांचा स्मृतिचिन्ह व शाल देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. विनायक तुमराम यांचे अध्यक्षीय भाषण प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक सुनील कुमरे यांनी केले. तर आभार संतोष आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुन आत्राम, दत्त दिगांबर नैताम, गणेश कुळमेथे, आकाश मेश्राम, संजय उईके, विजया कुमरे, साक्षी कुमरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात विदर्भातील बहुसंख्य आदिवासी समुदाय उपस्थित होते.