नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची तारीख रविवारी केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का, असा सवाल मेटे यांनी केला आहे.
देशात कोरोनाचा कहर असताना आलेल्या राम मंदिर भूमिपजन वृत्तावर शरद पवार यांनी लगेच आपली प्रतिक्रिया दिली होती. मंदिर बंधून कोरोना जाईल असं काहींना वाटत आहे, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला होता. त्यावर आता भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विनाय मेटे यांनी आज शरद पवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
मंदिर बांधून कोरोना जाणार नाही अस त्यांच म्हणणं असेल तर मंदिर न बांधून तो जाणार आहे का, असा प्रश्न विनायक मेटे यांनी शरद पवार यांना केला आहे. शरद पवार यांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अवमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री आता मूग गिळून गप्प का ? त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
शरद पवार काय म्हणाले होते ?
कोरोनामुळं जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याचा विचार आम्ही करतोय. त्याला पहिलं प्राधान्य देतोय, पण काहींना वाटतंय मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळं त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, असे शरद पवार म्हणाले होते.