मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – “शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल. तसेच ई-लर्निंग शिवाय सध्या पर्याय नाही. त्यासाठी सगळ्या बाजुंनी आपण मतमतांतरेही घेत आहोत. महाराष्ट्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत मार्ग काढला असून निर्णय घेतल्याचं” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्यावेळी राऊत यांनी कोरोना संसर्गाच्या संकटात शिक्षणाचा खेळखंडोबा किंवा बट्ट्याबोळ आहे की नाही? कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात तरुणांनी, मुलांनी शिक्षणाचं काय करावं असा प्रश्न विचारला होता.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून शाळा-महाविद्यालयांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्ग तसेच शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “शिक्षण हे जीवनावश्यक गोष्टींपैकी एक आहे. त्यासाठी आपणही खूप विचार करुन काम करतोय. आता बघा. जुलै जवळपास संपत आला. जूनमध्ये खरं तर शाळा सुरु होतात. आता शाळा कधी सुरु होणार? या मुद्द्यावर मी माझी संकल्पना मांडली ती हीच की, आता शाळा हा अस्तित्वात असलेला कन्सेप्ट तूर्त बाजूला ठेवा.”
“शिक्षण कधी सुरु होणार यावर माझा भर आहे. त्यासाठी आपण हाही विचार केला की, ग्रामीण भागात जिथे जिथे शाळा सुरु कराव्यात का? तिथे शक्य आहे. सुविधा आहेत तिथे ऑनलाईन शिक्षण सुरु करावं का? ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आपल्याला खूप झाले आहेत. त्यासाठी आपण केंद्र सरकार सोबत बोलतोय. आता खरं तर शिक्षण एकतर्फीच होणार. जसं माझं फेसबुक लाईव्ह होतं. तसेच ते होणार आहे. टीव्ही चॅनेलवरुन शिकवता येईल का यावरही आपण काम करतोय. त्याशिवाय मुंबई महापालिकेच्या शाळेत आपण एसडी कार्ड लोड करुन टॅब दिले आहेत. तसाही प्रयत्न सुरु आहे. त्यात ई-लर्निंग आहे. पाठ्यपुस्तक आहेत असे प्रयत्न सुरु आहेत” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रातील अंतिम वर्षीच्या परीक्षांसंदर्भात आपण मार्ग काढला आहे. परीक्षा होऊ नये असे कुणाचं मत नाही. माझंही तसे मत नाही. माझं मत आहे परीक्षा व्हावी, पण हे काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. आपण अंतिम वर्षाच्या मुलांना जी काही सेमिस्टर झालीत त्याचे अॅग्रीगेट करुन मार्क देऊन त्यांचा आयुष्यातला अडथळा दूर करावा, त्यांना पास करावे, सरासरी मार्क देऊन त्यांना रिझल्ट द्यावा. ज्यांना कोणाला वाटत की मी त्याच्याहून चांगली कामगिरी बजावू शकतो त्यांची आपल्याला शक्य होईल तेव्हा परीक्षा जाहीर करुन परीक्षा घेऊ. ज्यांना असे वाटतंय की, परीक्षेला बसायचंच तेव्हा त्यांनी बसावं आणि तेव्हा मात्र एकच काय तो निर्णय घ्यावा लागेल. एकतर अॅग्रीगेट केलेल्या मार्कचा रिझल्ट घ्या अथवा परीक्षेचा” असं परीक्षेबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.