बहुजननामा ऑनलाइन टीम – रस्त्याच्या कडेला कार उभी करून बोलत उभा असलेल्या चौघांना दुस-या भरधाव कारने धडक(accident in kalyan) दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणमध्ये बुधवारी (दि. 9) रात्री ही घटना घडली आहे.
विजय सोनवणे आणि गणेश दराडे असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर बाळकृष्ण बोडेकर, समीर जाधव अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक गणेश दराडे आणि त्यांचे इतर दोन सहकारी कारमधून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कल्याण वालधुनी रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या एक सहकारी विजय सोनवणे हा त्यांना रस्त्यात भेटल्याने दराडे यांनी गाडी थांबवली. दराडे आणि कारमधील त्याचे इतर दोघे मित्र खाली उतरून सोनवणे यांच्याशी गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणा-या कारने त्यांना धडक दिली. या धडकेत आय-ट्वेण्टी कार ही विजेचा खांबाला जाऊन धडकली. या अपघातात विजय सोनवणे हे जागीच ठार झाले. तर गणेश दराडे यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाळकृष्ण बोडेकर आणि समीर जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण हे करत आहेत.