बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिच्या मुंबईतील कार्यलयावर पालिकेनं आज कारवाई केली. या कार्यालयातील काही अनधिकृत असलेलं अंतर्गत बांधकाम पाडण्यात आलं. यानंतर आता कंगनानं एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. परंतु यावेळी मात्र कंगनाची जीभ घसरली आहे. कंगानं उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलंत. उद्या तुमचं गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही असं ती म्हणाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाली कंगना रणौत ?
कंगनानं तिच्या इंस्टवरून एक व्हिडीओ शेअर केलं आहे. यात ती म्हणते, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं ? फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलंत आणि मोठा बदला घेतला आहे. आजं माझं घर तुटलं आहे. उद्या तुमचं गर्वहरण होईल.”
पुढे बोलताना कंगना म्हणाली, “वेळेचं चक्र आहे. कोणासाठीही नेहमी काही एकसारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी देशाला वचन देते की, मी केवळ अयोध्याच नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागिकांना मी जागरूक करणार आहे. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे. कारण याला देखील एक अर्थ आहे.” जय हिंद. जय महाराष्ट.”