मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय असल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावाण्याची वेळ आली आहे. मात्र, आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करुन ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांना तातडीने योग्य ते उपचार सुरु व्हावेत यासाठी टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
शुक्रवारी (दि.23) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड प्रभावीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीला वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या महत्त्वाच्या मागण्या
1. रेमडेसिविर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही. पण रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा.
2. महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लँट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरुन इतर मार्गाने राज्याला पाठवावेत.
3. रेमडेसिव्हीर व्यतिरिक्त इतर औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो. हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
4. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आला. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करुन लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे.
5. विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक