बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत आहे. असे असतानाच भारतातील गंभीर परिस्थिती पाहून शेजारी पाकिस्तानने मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानातील सेवाभावी संस्था असलेल्या एधी फाउंडेशनने भारताला 50 रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी एधी फाउंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असलेल्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे
यासंदर्भात फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही भारतातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कोरोनाचा भारतावर झालेल्या गंभीर परिणामासंदर्भात आम्हाला चिंता आहे. सध्याच्या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये 50 रुग्णावाहिका, तसेच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो असे पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातून पाठवण्यात येणारी ही टीम स्वत: सोबत सर्व सामान घेऊन येणार असून भारताकडून केवळ परवानगी हवी आहे. आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीही नको. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू. आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, इतर अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफ असतील, असे पत्रात म्हटले आहे. तुम्ही आम्हाला केवळ भारतात येण्याची परवानगी द्या. तुम्ही सांगाल त्या प्रदेशांमध्ये आम्ही आमच्या टीम पाठवण्यास तयार आहोत. आमच्या मदतीमुळे भारतीय नागरिकांना दिलासा मिळणार असेल तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला आम्ही तयार असल्याचे एधी यांनी पत्रात म्हटले आहे.