मुंबई : बहुजननामा ऑनलाइन
राज्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात पुणे आणि मुंबई विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर मधील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली.
हा कसोटीचा काळ
उद्धव ठाकरे म्हणाले, इतर देश फक्त कोरोना एके कोरोना असा मुकाबला करत आहेत. मात्र आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला आहे. आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण येणार आहेत. त्यातच पाऊस पडत असल्याने आपले आव्हान अधिकच मोठे असून हा कसोटीचा काळ असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरुपी चेहऱ्यावर मास्क लावणे, शारिरीक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
15 दिवसात चांगले परिणाम दिसतील
सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले आहे. तसेच असं झाले तर 15 दिवसांमध्ये चांगले परिणाम दिसतील, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहिम अधिक गांभीर्यपूर्वर राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक कती द्या, असं आवाहन त्यांनी आढावा बैठकीत केले.
जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा
सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही, इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात जन जागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.