बहुजननामा ऑनलाईन – शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि जवान देशाचे प्रमुख आधारस्तंभ असून भारतीय प्रगतीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे नुकतेच विंग कमांडर अभिनंदन यांनी आपल्या शौर्याने हे सिध्द करुन दाखविले आहे. भारतीय जवांनाप्रमाणे शेतकरीहि संपूर्ण देशासाठी अन्न पिकवण्याचे काम करतो. हे दोघेही देशाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावतात ,असे राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी केले. रत्नागिरी येथे जिल्हा कृषि महोत्सवात शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर दिवसरात्र डोळ्यात तेल घालून सज्ज असतो त्याचप्रमाणे “शेतकरी संबंध देशासाठी धान्य पिकवितो म्हणूनच आपल्याला अन्नधान्य उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान नेहमीच झाला पाहिजे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि शेतीविषयक विविध तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनाद्वारे मिळणार आहे”,प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग शेती उत्पन्न वाढविण्यासाठी होत आहे. कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, अवजारे विकसित होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वोतपरी प्रयत्न केले जातील असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
विविध पारितोषिके देवून शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. सर्व पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचे यावेळी पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद आदर्श शेतकरी, भात पीक विजेते शेतकरी, आदर्श शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणारे महिला बचतगट व शेतकरी गटांनाही यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.