कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राजधानी दिल्लीमध्ये शिवजयंती मोठ्याप्रमाणात साजरी केली जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच हजारो लोकांना एकत्र करत ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली गेली. ज्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. नौदल प्रमुख सुनील लांबा आणि लष्कर प्रमुख जन. बिपीन रावत यांची प्रेरणादायी उपस्थिती सर्वांना भावून गेली. खासदार संभाजीराजे यांच्या निर्विवाद व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण दिल्लीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.
शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता किंवा मराठी लोकांपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण राष्ट्राचा उत्सव झाला पाहिजे. शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांचं स्वराज्य हे जनतेचे सुराज्य होते. खऱ्याअर्थाने संपूर्ण देशवासीयांच्या मनावर आजही शिवरायांचे अधिराज्य कायम आहे. चांगल्या पिढ्या घडवायच्या असतील, तर आपल्याला शिवरायांचा इतिहास संपूर्ण देशाच्या नवीन पिढीला शिकवावा लागेल. त्यासाठीच आम्ही शिवजयंती दिल्लीमध्ये करत आहोत. दिल्लीच्या शिवजयंती उत्सवाला राष्ट्रोत्सव म्हणून आम्ही साजरी करतोय.
ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिवराय घडले त्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडवत आहोत. दिल्लीमध्ये संपूर्ण देशातील लोक राहतात. त्यांनी पाहिले पाहिजे की महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या फार श्रीमंत आहे. जवळपास ३०० वारकरी, पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, धनगरी ढोल, लेझीम पथक, वासुदेव, गोंधळी, शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ अशा अनेक पारंपरिक वाद्यांनी दिल्ली बहरून जाणार आहे. यावर्षी विशेषत्वाने पूर्वोत्तर राज्यांच्या लोककला मिरवणुकीमध्ये सादर होणार आहेत. आसाम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यांचे कलाकार सहभागी होतील. पंजाब, हरियाणा, आणि उत्तर भारतामधील लोककलादेखील पाहायला मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १५०० कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यांना दिल्लीमध्ये येण्यासाठी एका विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. या विशेष रेल्वे गाडीला ‘महाराणी ताराराणी एक्स्प्रेस’ असे नाव दिले आहे. ही विशेष रेल्वे सर्वांसाठी मोफत आहे..