नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे– जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला. एका वृत्तसंस्थेशी बोलतांना गिरीश व्यास म्हणाले की, इतकंच नाही तर भाजपनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कर्नाटक निकालानंतर राज्यातील भाजपच्या गटात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.
कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तब्बल १२ जागांवर विजय मिळवला. दोन जागा काँग्रेसने तर एक जागा अपक्षने जिंकली. भाजपला कर्नाटकात सत्ता टिकवण्यासाठी १५ पैकी किमान ६ जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं.
तर जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
Visit : bahujannama.com