नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने कंटाळून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या घटना दुर्दैवी असून, कांद्याला हमीभाव मिळावा, रासाका व निसाका सुरू करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तहसीलवर आसूड मोर्चा काढण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, राज्य प्रवक्ते संदीप जगताप, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव मोरे, उत्तर महाराष्ट्र सचिव सोमनाथ बोराडे, स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, युवा जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव, तालुकाध्यक्ष संजय पाटोळे, नितीन कोरडे यांच्या नेतृत्वाखाली कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, निसाका व रासाका त्वरित चालू झालाच पाहिजे, साखर कारखान्याची एफआरपीप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत निफाड मार्केटपासून आसूड कडाडत मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा तहसीलजवळ आल्यानंतर गेटवर अडविण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी केंद्र व राज्य सरकारवर टिकेची झोड उठवत वडघुले म्हणाले, कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. शेतकरी आत्महत्या करत असूनही सरकार शेतकरी प्रश्नावर गंभीर नाही. यामुळे जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट आहे. रानवड सहकारी साखर कारखानाही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सुरू होऊ शकला नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन गेल्या साडेचार वर्षांत सरकारने फक्त फसवणूक केली आहे. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. संदीप जगताप, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव आदींनी मनोगत व्यक्त केले.
मोर्चाच्या सुरुवातीला माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मोर्चाला पाठिंबा देत सरकारवर आसूड ओढले. यावेळी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. अनिल वडघुले, संदीप उबाळे, बळवंत जाधव, शिवराम रसाळ, सुभाष गायकवाड, उत्तम रायते, त्र्यंबक शिंदे, बाळासाहेब काशीद, सुधाकर धारराव, अशोक शिंदे, दशरथ सुडके, बाकेराव कुंभार्डे, युनूस शेख, रोहिदास फुलगर, त्र्यंबक चव्हाणके, संपत मोरे, नवनाथ घोटेकर, अशोक वाघ, अरुण कुशारे, रामभाऊ वडघुले, अनिल धारराव आदींनी मोर्चाचे नियोजन केले.