सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – पक्षविरोधी कारवाया तसेच पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीस वारंवार गैरहजर राहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटचे जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक राज्य उपाध्यक्ष के. डी .कांबळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
२५ जानेवारी रोजी जिल्हा कार्यकारिणीची बैठक मोहोळ येथील शहाजीराव पाटील सभागृहात तालुकाध्यक्ष विठ्ठल शिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्य सरचिटणीस तथा महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व प्रमुख मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे हे गैरहजर होते. हे जिल्हाध्यक्षची कृती पक्षाच्या विरोधात असल्याने त्यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
दरम्यान ६ जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बैठकीला जिल्हा अध्यक्ष अशोक सरवदे हे जाणून बुजून अनुपस्थित होते. नऊ फेब्रुवारी रोजी सोलापुरात पक्षाचा महामेळावा आयोजित केला असतांना त्याच्या तयारीत सरवदे यांनी कोणतीच भूमिका पार पाडली नाही. उलट जिल्ह्यामधील कार्यकत्र्यात या कार्यक्रमास जाऊ नका. अशा सूचना करीत आहेत. ही बाब पक्षाच्या दृष्टीने चुकीची असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे के.डी .कांबळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना अशोक सरवदे म्हणाले की, गेल्या ४ वर्षापासून मी जिल्हाध्यक्षपदावरुन जिल्ह्यात संघटन बांधले आहे, असे असताना केवळ येणाऱ्या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान मला नको म्हणून सुडापोटी केलेले हे कृत्य आहे. के. डी. कांबळे यांना पुढे करुन माझी केलेली हकालपट्टी बेकायदेशीर आहे. धमक असेल तर राजा सरवदे यांनी मला काढल्याचे लेटरपॅडवरुन घोषित करावयाला हवे होते. परंतु मला काढण्याचा अधिकार केवळ ना. रामदास आठवले यांनाच आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष मीच आहे.