कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दसरा चौकातील मैदानातून मोर्चास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने घोषणा देत समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे, गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाची जात निहाय जनगणना करावी, एससी, एसटीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तीसाठी स्वतंत्र तिसरी सूची कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा, समाजाला २.५ टक्के आरक्षण वाढवून द्यावे, बार्टीच्या धर्तीवर संशोधन संस्था स्थापन करावी, भटक्या विमुक्त असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे, विविध मंदिरामध्ये शासन नियुक्त पुजारी म्हणून नियुक्ती करावी, लोककला व लोककलावंतांच्या संवर्धनासाठी संशोधन केंद्र निर्माण करावे अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी बबनराव कावडे, बाळासाहेब काळे, अभिजित गजगेश्वर, आंनदराव वासूदेव, प्रभूदास खाबडे, अस्लम मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चास वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयंसिगपूर यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता.