हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण देवून त्याची अंमलबजावणी करावी, हिंगोली शहरात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची जागा न. प.कडे हस्तांतरीत करून तेथे सभागृह बांधावे, निराधार योजनेतंर्गत तीन हजार रूपये मानधन देण्यात यावे यासह इतर मागण्या अखील भारतीय मातंग संघाच्या वतीने सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे करण्यात आली.
मातंग समाजाच्या ८ टक्के आरक्षणाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून लावून धरल्या जात आहे. परंतु, अद्याप त्यावर निर्णय झालेला नसून, याकडे सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मातंग संघाने केला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ना.कांबळे यांची भेट घेवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हिंगोली शहरातील केमिस्ट भवनाच्या समोरील जागेत क्रांतीवीर लहुजी साळवे सभागृह बांधावे. मातंग बांधवांसाठी २५ हजार घरकूल मंजूर करावीत, दलीत मित्र आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना एक हजार रूपये मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्याची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदराव शिखरे, तालुकाध्यक्ष हरिभाऊ शिखरे, अशोक आव्हाड, बापुराव जोगदंड, गंगाधर सोनटक्के उपस्थित होते.