सिंधुदूर्ग : बहुजननामा ऑनलाइन – भाजप- शिवसेना विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र लढत असले तरी नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ही युती पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही, अशा शब्दांत सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.
कणकवलीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत सुभाष देसाई म्हणाले कि, ‘युती सरकारमध्ये शिवसेना भागीदार आहे. नाणार पुन्हा आणू, असं भाजपवाले म्हणत असले तरी, पण कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही.असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणेंनी आता नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
काही दिवसांपूर्वी यासंदर्भात खासदार विनायक राऊत यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’ अश्या घोषणा खासदार विनायक राऊत यांनी व्यासपीठावरून दिल्या होत्या. ते म्हणाले कि, ‘ आम्हाला रिफायनरी नको, कारण आमचं नातं लाल मातीशी आहे. मुख्यमंत्री दलालांच्या दिखाव्याला बळी पडले , परंतु शिवसेना स्थानिक कायम जनतेसोबत आहे.’
तसेच खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना येथील जनतेचे मत जाणून घ्यायचे असेल तर समोरासमोर चर्चेला या, असे आव्हान देखील दिले होते. त्याचप्रमाणे जे शिवसैनिक या नाणार प्रकल्पाच्या समर्थनाची बाजू घेत आहेत, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणार असेही त्यांनी म्हंटले होते. दरम्यान भाजपच्या महाजनादेश यात्रेवेळी गाजलेल्या नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य करत ‘नाणार रिफायनरी ही नाणारलाच झाली पाहिजे असं आमचं मत आहे, मात्र इथं झालेल्या विरोधामुळे तो निर्णय थांबवावा लागला. ,मात्र आता जर लोक तयार असतील, तर त्यावर पुन्हा चर्चा करण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे शिवसेनाच्या या भूमिकेचा युतीवर काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
Visit : bahujannama.com