परभणी : बहुजननामा ऑनलाईन – शिवरायांनी कधीही अध्यात्मिक गोष्टीला विरोध केला नाही. मात्र, धर्मातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रध्देला विरोध निश्चित केला. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावर शिव पिंड आहेत. तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा देखील त्यांनी रायरेश्वर मंदिरातील शिवपिंडीसमोर आपल्या मावळ्यांसह घेतली. याचा अर्थ शिवाजी महाराज अध्यात्मिक होते आणि इतर धर्माचा कधीही ते विरोध करत नव्हते; परंतु आपल्या हिंदू धर्मावर कोणी आघात करीत असेल तर हिंदू धर्माचे ते रक्षक होते, असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या गेल्या दहा वर्षांपासून व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही श्रीराम चौकात व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपनेते विठ्ठल रबदडे होते. व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुधाकर खराटे, जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, महिला आघाडी प्रमुख सखुबाई लटपटे, पं.स.उपसभापती सारिका शेंडगे, न.प.सभापती सीमा राखे, पं.स.सदस्य जानकीराम पवार, ॲड. विजय निरस, पालमचे तालुकाप्रमुख हनुमंत पवार, शहर प्रमुख गजानन पवार, आयोजक विष्णू मुरकुटे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपसभापती सारिका शेंडगे, जि.प.सदस्य सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विष्णू मुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मुंजाजी चोरघडे यांनी केले तर आभार बाळासाहेब राखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकारी व मित्र परिवारांनी पुढाकार घेतला.