यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील गोरगरीब नवबौद्ध घटक, अपंग, विधवा, गोरगरीब महिलांना सौभाग्य योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. आता निधी संपल्याची बतावणी करून दीनदयाल योजनेचे गाजर दाखविण्यात येत आहे. गोरगरिबांच्या घरातील अंधार दूर होऊन त्यांना प्रकाशात जीवन जगता यावे म्हणून शासनाने सौभाग्य योजना सुरू केली. या योजनेतून नवबौद्ध घटक, अपंग, विधवा, गोरगरिबांना या योजनेचा लाभ दिला जातो. शहरातील ३४९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु, पाटीपुरा, अशोकनगर, अण्णाभाऊ साठे चौक, दलित वस्ती, रविदासनगर, तलाव फैल या परिसरातील शेकडो नागरिक या योजनेपासून वंचित आहे. नागरिकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज दिले असून, अर्ज मंजूर केले नाही.
सौभाग्य योजनेचा निधी संपला असून, दीनदयाल योजनेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेकांना आजही अंधारात राहावे लागत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. परंतु अद्यापही काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वीज कनेक्शन द्यावे अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, लता कोरंगे, बेबी चहांदे, शुभांगी मेश्राम, सुलोचना गायकवाड, रंजना मंगले, कलावती भोयर, अजय बच्छराज, रवी डोंगरे यांनी दिला आहे.