औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – ‘अस्मितादर्श’ने दलित, शोषित, वंचितांच्या व्यथा-वेदनांना मुखर केले. त्यांच्या न्याय्य हक्कांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन कवी व विख्यात सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी येथे केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मधुकरराव मुळे होते. माजी कुलगुरू व विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी प्रमुख वक्ते म्हणून भाष्य केले. मंचावर पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे प्रतिष्ठानच्या डॉ. निवेदिता पानतावणे यांची उपस्थिती होती. मंजुळे म्हणाले, की डॉ. पानतावणे यांची पोकळी आजही जाणवते आहे. ही पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. मनोरंजनापलीकडे दलित चळवळ पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून झाले. माझी पहिली कविता ‘अस्मितादर्श’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे लोक मला ओळखू लागल्याचे मंजुळे यांनी अभिमानाने नमूद केले. डॉ. पानतावणे यांनी माझ्यासारख्या अनेक साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
उपेक्षितांच्या वेदना चव्हाट्यावर आणून त्यांना चळवळीचे रूप देण्याचे अतिशय अवघड काम साध्य केले. सध्याचा काळ व्हॉट्स ॲप विद्यापीठाचा असून फेक माहितीचा बोलबाला आहे. हल्ली क्षणभंगूर लिहिले जात असल्याबद्दल खंत व्यक्त करून वाळूवर लिहून मिटवून टाकायचे तसे सारे सुरू आहे. अशा युगात ‘अस्मितादर्श’चालू राहणे हे मोठे धारिष्ट्य असल्याचे मंजुळे म्हणाले. यावेळी प्रा. दिलीप बडे यांनी बाबासाहेबांची दुर्मीळ पत्रे नागराज मंजुळे यांच्या स्वाधीन केली. प्रास्ताविक डॉ. निवेदिता पानतावणे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश साबळे यांनी केले. आभार प्रमोद खोब्रागडे यांनी मानले.