मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत ‘हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल के राखिये, जिसने आपको ये तीन भेट दी हो, साथ, समय और समर्पण…’ असे म्हटले आहे. या पोस्टमुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे का, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिमंडळातब स्थान न मिळाल्यामुळे संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा चालू होती. तसेच संजय राऊत हे ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा असताना संजय राऊत यांनी आता ते नाराज नसल्याचे सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीनही पक्षातील नेते नाराज दिसून येत आहे. वाशिमच्या भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेनेतील गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही त्यांची नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप ठाकरे यांच्यावर केला आहे.
आता सगळ्याच नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकत नसताना त्यांची नाराजी कशी दूर करायची, असा प्रश्न शिवसेनेसमोर निर्माण झाला आहे.भास्कर जाधव म्हणाले की, मी राजकारणात अनेक वर्ष कार्यरत असून राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळले आहे. इतका अनुभव असताना मी कुठे कमी पडलो, हेच मला कळत नाहीये. शिवसेनेत प्रवेश करताना यांच्यासोबत चर्चा झाली असताना त्यांनी आश्वासनं दिली असता ती त्यांनीच पाळली नाहीत. मला कशाचाही मोह नाही. पण दिलेले आश्वासन पाळायला पाहिजे.
Visit : bahujannama.com